प्रश्न १(अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय.......शहराचे उत्खनन करताना सापडले.
(अ) दिल्ली
(ब) हडप्पा
(क) उर
(ड) कोलकाता
उत्तर - क ) उर
(२) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार... येथे आहे.
(अ) नवी दिल्ली
(ब) कोलकाता
(क) मुंबई
(ड) चेन्नई
उत्तर -अ ) नवी दिल्ली
प्र. ब पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा :
अमूर्त वारसा प्रदेश
(१) कुटियट्टम - केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा
(२) रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य
(३) रामलीला -उत्तर भारतातील सादरीकरण
(४) कालबेलिया - राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य
उत्तर:
चुकीची जोडी : रम्मन पश्चिम बंगालमधील नृत्य.
दुरुस्त केलेली योग्य जोडी : रम्मन गढ़वाल (उत्तराखंड) येथील धार्मिक उत्सव व विधिनाट्य.
प्रश्न २ पुढील संकल्पना स्पष्ट करा
(१) उपयोजित इतिहास.
उत्तर :
(१) एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे 'उपयोजन' होय.
(२) इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे, यालाच 'इतिहासाचे उपयोजन' असे म्हणतात.
(३) इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते, त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो.
(४) इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात; तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते.
(२) अभिलेखागार.
उत्तर :
(१) ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात, त्या ठिकाणास 'अभिलेखागार' असे म्हणतात.
(२) अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते.
(३) अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणना करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो.
(४) भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वांत मोठे
अभिलेखागार आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतःचे स्वतंत्र अभिलेखागारही आहे.
प्र. ३ पुढील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा :
(१) जनांसाठी इतिहास' ही संकल्पना स्पष्ट करा.
उत्तर :
(१) इतिहासाचा संबंध लोकांच्या वर्तमान जीवनाशी जोडणारे क्षेत्र म्हणजे 'जनांसाठी इतिहास' होय.
(२) इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. वर्तमानकालीन समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी भूतकालीन घटनांविषयीचे ज्ञान उपयुक्त ठरू शकते.
(३) या ज्ञानाचा उपयोग लोकांना वर्तमान आणि भविष्यकाळात कसा होईल, याचा विचार 'जनांसाठी इतिहास' या विषयात केला जातो.
(४) 'उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी 'जनांसाठी इतिहास' असा पर्यायी शब्दप्रयोगही केला जातो .
(२) ऐतिहासिक वारसास्थळांच्या संदर्भात युनेस्कोने कोणते कार्य केले आहे?
उत्तर : संयुक्त राष्ट्रांच्या 'युनेस्को' या आंतरराष्ट्रीय संस्थेने ऐतिहासिक वारसास्थळांच्या संदर्भात पुढील कार्य केले आहे .
(१) नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे जतन व संवर्धन कसे करावे याची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली.
(२) जागतिक वारसापदास पात्र ठरणारी स्थळे आणि परंपरा यांची यादी ही संघटना वेळोवेळी जाहीर करते.
(३) अशा याद्या जाहीर करून युनेस्को प्राचीन वारसा जपण्यासाठी लोकांचे व राष्ट्राचे लक्ष वेधून घेते.
(३) सांस्कृतिक वारसास्थळांच्या यादीतील महाराष्ट्रातील ठिकाणे कोणती, हे शोधून लिहा.
उत्तर :
युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील पुढील ठिकाणांचा समावेश आहे
(१) अजिंठा आणि घारापुरीची लेणी.
(२) वेरूळची लेणी व कैलास मंदिर.
(३) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई..
या यादीत नसलेले रायगड, देवगिरी, जंजिरा, सिंधुदुर्ग इत्यादी गड किल्ले व जल किल्ले हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा स्थळांत समाविष्ट होतात.
प्र. ५ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा :
(१) तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो .
उत्तर :
(१) लाखो वर्षांच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवी कौशल्ये अवगत करीत गेला.
(२) दगडांपासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञानयुगात आला.
(३) कृषी उत्पादन वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य अभियांत्रिकी इत्यादींमध्ये बदल होत गेले. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
(२) जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारा जाहीर केली जाते.
उत्तर :
(१) पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असून त्यांविषयी आपल्या मनात आपुलकी असते.
(२) हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्याचे संवर्धन होणे गरजेचे असते.
(३) काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होऊ नये आणि त्याचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी 'युनेस्को' या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते.
प्रश्न ६पढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा :
(१) पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा :
(अ) विज्ञान (ब) कला (क) व्यवस्थापनशास्त्र
उत्तर :
प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा इतिहास स्वतंत्र असतो. या ज्ञानसंचयाच्या आधारेच प्रत्येक विषयाच्या प्रगतीची दिशा व वाटचाल निश्चित होते. या सर्वच विषयांतील संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. त्यांतील काही विषय
(अ) विज्ञान : मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नांतून अनेक वैज्ञानिक शोध लागतात. त्याआधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधांमागील कारणपरंपरा, कालक्रम आणि सिद्धान्त यांचा अभ्यास केला जातो. विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान प्रत्येक शोधाच्या वेळी उपयुक्त ठरते.
(ब) कला : कोणत्याही कलेचा विकास वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या आधारेच अभिव्यक्त होत असतो. या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरांचा इतिहास समजून घ्यावा लागतो. संबंधित कलाकृती कशी साकार झाली, त्यामागे निर्मात्याची कोणती मानसिकता होती, प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या या सर्व सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
(क) व्यवस्थापनशास्त्र : उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार व विक्री या सर्व ठिकाणी व्यवस्थापनशास्त्राची आवश्यकता असते. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संघटनांद्वारे हे व्यवहार चालू असतात. या सर्व व्यवस्थापनांमध्ये सुधारणा करणे, त्यांचा अभ्यास करणे, व्यवस्थापन सुलभ करणे यांसाठी भूतकालीन यंत्रणांचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्यांचा इतिहास समजून घेण्याची गरज असते.
(२) उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो?
उत्तर :
इतिहास द्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी पुढीलप्रमाणे सहसंबंध असतो
(१) भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो.
(२) आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा यांबद्दल त्याच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशाचा इतिहास पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमानातील मानवाला मिळते. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशाचे जतन करता येते.
(३) उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते. सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते.
(४) उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमानकाळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन होते.
(३) इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान १० उपाय सुचवा.
उत्तर : इतिहासाच्या साधनांत लिखित, भौतिक आणि मौखिक साधने यांचा समावेश होतो. या साधनांचे वेगवेगळ्या पद्धतीने जतन करावे लागते. त्यासाठी माझ्या मते पुढील उपाययोजना कराव्यात :
(१) किल्ले, स्मारके, राजवाडे अशा ऐतिहासिक वास्तूंची नियमित डागडुजी केली पाहिजे.
(२) वास्तूंची नासधूस करणे, त्यावर नावे लिहिणे वा कोरणे हे टाळण्याबाबत उपाय योजावेत.
(३) ऐतिहासिक नाणी, हत्यारे इत्यादी वस्तू जपून हाताळाव्यात त्यांची चोरी होणार नाही याची काळजी घ्यावी.
(४) ओव्या, लोकगीते आदी मौखिक साहित्याचे संकलन करून ते लिखित स्वरूपात आणावे.
(५) प्राचीन ग्रंथांचे वाळवी व बुरशी यांपासून संरक्षण करावे. ओलसरपणा, दमट हवा यांमुळे बुरशी लागते. म्हणून त्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशक औषधांचा वापर करावा.
(६) या सर्व साधनांच्या जतनासाठी अनुभवी तज्ज्ञ मंडळींचे सल्ले घ्यावेत.
(७) ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठी कडक कायदे करावेत.
(८) या साधनांचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन समाजाचे प्रबोधन करावे.
(९) या साधनांविषयी, प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपलकी निर्माण केली पाहिजे. हा आपला प्राचीन वारसा आहे, त्याचे महत्त्व पटवून देऊन त्याविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण करावी.
(१०) ऐतिहासिक साधनांच्या जतनात सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सामील करून घ्यायला हवे. तसे उपक्रम हाती घ्यायला हवेत.
(४) नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात?
उत्तर :
नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पांतून पुढील गोष्टी साध्य होतात - (१). प्रकल्पांतर्गत वारसास्थळाच्या मूळ स्वरूपात बदल न करता जतनाची व संवर्धनाची कामे करणे शक्य होते.
(२) स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता कशी आहे, त्यांच्यापुढे वर्तमानात कोणती आव्हाने आहेत तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहेत यांचा आढावा घेता येतो.
(३) सांस्कृतिक वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करीत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत; यासाठी उपाययोजनांचे नियोजन करून स्थानिक लोकांना त्यात सहभागी करून घेता येते.
(४) स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील, अशा उद्योग-व्यवसायांना चालना मिळावी, यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होते.
0 Comments