प्र.१ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा :
(१) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे.... हे पहिले सरसंचालक होत.
(अ) अलेक्झांडर कनिंगहॅम
(ब) विल्यम जोन्स
(क) जॉन मार्शल
(ड) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
उत्तर -(अ) अलेक्झांडर कनिंगहॅम
(२) 'हितोपदेश' या संस्कृत ग्रंथाचा.. ..... यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला.
(अ) जेम्स मिल
(ब) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
(क) माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
(ड) जॉन मार्शल
उत्तर - (ब) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
प्र.२ पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा :
ग्रंथ-इतिहासलेखन पद्धती
(१) 'हू वेअर द शूद्राज' - वंचितांचा इतिहास
(२) 'स्त्री-पुरुष तुलना - स्त्रीवादी लेखन
(३) 'द इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डन्स : १८५७' - मार्क्सवादी इतिहास
(४) केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया - वसाहतवादी इतिहासलेखन
उत्तर:
चुकीची जोडी : द इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डन्स: १८५७ - मार्क्सवादी इतिहास
दुरुस्त केलेली योग्य जोडीः द इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डन्स: १८५७ - राष्ट्रवादी इतिहास
प्र. २ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा :
(१) प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
उत्तर :
(१) इंग्रजी शिक्षणाने भारतीयांत निर्माण झालेल्या आत्मजाणिवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले.
(२) ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतांतील इतिहासलेखकांनी विरोध केला.
(३) आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले. राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा प्रभाव होताच.त्यातूनच प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
(२) 'बखर' हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे
उत्तर :
(१) ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र-शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवासवर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो.
(२) बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात. तसेच थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील घरांची वर्णन असतात.
(३) तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहासलेखनाला उपयुक्त ठरतात; म्हणून 'बखर' हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.
प्र. ३ पुढील प्रश्नांची २५-३० शब्दांत उत्तरे लिहा :
(१) बाबराने आपल्या आत्मचरित्रात कोणते वर्णन केले आहे?
उत्तर :
बाबराने आपल्या तुझुक-ई-बाबरी या आत्मचरित्रात पुढील बाबींची वर्णने केली आहेत
(१) त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने.
(२) ज्या ज्या प्रदेशांत त्याने प्रवास केला, त्या त्या प्रदेशांची व शहरांची वर्णने आहेत.
(३) स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज आणि वनस्पतीसृष्टी यांची निरीक्षणे बारकाईने नोंदलेली आहेत.
(२) राष्ट्रवादी इतिहासलेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते?
उत्तर :
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले सर्वच लिखाण राष्ट्रवादी विचारांनी भारलेले होते. त्यांचे राष्ट्रवादी इतिहासलेखनातील योगदान पुढीलप्रमाणे .
(१) १८५७ साली भारतात झालेल्या बंडाकडे त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेला तो पहिला स्वातंत्र्यसंग्राम या दृष्टीने पाहिले व त्यावर १८५७ चे स्वातंत्र्यसमर' असे पुस्तक लिहिले.
(२) त्यांच्या या आणि अन्य ग्रंथांमुळे राष्ट्रवादी इतिहासलेखनाला प्रेरणा मिळाली तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.
(३) दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे व इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले.
प्रश्न ४ पूढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा :
(१) मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?
उत्तर : स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहासलेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात; त्यात 'मार्क्सवादी इतिहासलेखन' हा एक प्रमुख प्रवाह आहे.
(१) मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला 'मार्क्सवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.
(२) मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे.
(३) प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो. याचे विश्लेषण करणे, हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे मुख्य सूत्र आहे.
(४) मार्क्सवादी इतिहासकारांनी जातिव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहासलेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो.
(२) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहासलेखनातील योगदान स्पष्ट करा.
उत्तर :
भाषाशास्त्र, व्युत्पत्तिशास्त्र आणि इतिहासलेखन यांत मूलभूत संशोधन करणाऱ्या वि. का. राजवाडे यांचे इतिहासलेखनातील योगदान पुढीलप्रमाणे-
(१) राजवाडे यांनी 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' असे शीर्षक असणारे २२ खंड संपादित केले.
(२) इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय, हा विचार मांडला.
(३) केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकिकती म्हणजे इतिहास नव्हे, असे त्यांचे मत होते.
(४) आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे, हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला.
(५) अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे, याबाबत ते आग्रही होते..
(६) स्थळ, काळ व व्यक्ती या त्रयींनी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगांचे वर्णन इतिहासलेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते. इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेले ऐतिहासिक लेखन व मांडलेली मते हे इतिहासलेखनाला दिलेले मोठे योगदान आहे.
प्र. 6 पुढील संकल्पना स्पष्ट करा :
(१) प्राच्यवादी इतिहासलेखन.
उत्तर :
(१) अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना 'प्राच्यवादी अभ्यासक' असे म्हणतात.
(२) या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहासलेखन केले. या लेखनाला 'प्राच्यवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.
(३) प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास करून या भाषांची जननी प्राचीन इंडो-युरोपीय भाषा होती, अशी कल्पना मांडली.
(४) या प्राच्यवादी अभ्यासकांत छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांना पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवून भारताच्या इतिहासाचे लेखन केले.
(२) राष्ट्रवादी इतिहासलेखन.
उत्तर :
(१) एकोणिसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षणपद्धतीसुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहासलेखन केले त्या लेखनास 'राष्ट्रवादी इतिहासलेखन असे म्हणतात.
(२) या राष्ट्रवादी इतिहासलेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनाला विरोध केला.
(३) भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले.
(४) राष्ट्रवादी इतिहासलेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यास प्रेरणा मिळाली; तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.
(३) वंचितांचा इतिहास.
उत्तर :
१) समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले; अशा समूहांच्या इतिहासाला 'वंचितांचा इतिहास' असे म्हणतात.
(२) मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली.
(३) इटालियन तत्त्वज्ञ अँटोनिओ ग्रामची याने इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली.
(४) भारतात महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहासलेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. वंचितांच्या इतिहासातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे चित्रण केले गेले.
0 Comments